हे सरकार पहाटेचे नाही, दिवसाढवळ्या शपथ घेऊन स्थापन : नितीन राऊत

औरंगाबाद : गुप्त बैठकीचे अनेक सूर असतात, हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे. तिन्ही पक्ष सोबत काम करतील, सरकार पडणार नाही, असा विश्वास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादेत बोलत होते.
संजय राऊत आणि शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यावरुन नितीन राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावेळी नितीन राऊत म्हणाले, “हे सरकर पहाटेचं नाही, तर उघडपणे शफथ घेऊन स्थापन झालं असून ते भक्कमपणे उभं आहे. आम्ही पूर्ण काम करणार, जोरात करणार. आम्ही एक आहोत म्हणून चांगलं काम होतंय”
हवे तर सवलत दिली जाईल, मात्र वीजबिल माफ होऊ शकत नाही. सार्वजनिक कंपन्या चालवण्याला पैसे लागतात, त्यामुळं वीज बिल भरावं लागेल, वीज बिल माफ करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे, केंद्र सरकारने मदत केली तर राज्य सरकारही पुढं येईल, असं नितीन राऊत म्हणाले. गाव तांडे जे विजेपासून वंचित आहेत, तिथं वीज पोहोचवण्याचे काम आम्ही हातात घेतोय. काही ठिकाणी पोहोचणं कठीण आहे, मात्र आम्ही धोरण ठरवलं आहे, त्यानुसार वीज देऊ, असा निर्धार नितीन राऊतांनी व्यक्त केला.
आता नवीन औष्णिक प्रकल्प नाही, जे आहेत ते सुरू राहतील. पुढं औष्णिक प्रकल्प नाही. सौर ऊर्जेवर जोर देऊया त्यातून फायदा होईल, रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पदोन्नती आरक्षण हे भाजप सरकारने २०१७ मध्ये ओपनसाठी उघडे केले, आणि दलितांवर अन्याय केला, न्यायालयात हे प्रकरण आहे, त्यामुळं जास्त यावर बोलणं योग्य नाही, असं नितीन राऊत म्हणाले.




