सोमय्यांचा अनिल परबांना थेट इशारा, भावना गवळींवरुन पवारांवर हल्लाबोल

पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरुच ठेवलीय. सोमय्या यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांपासून सुरुवात करायची की शरद पवारांपासून या संभ्रमात असल्याचा खोचक टिप्पणीही यावेळी केली. पुढील आठवण्यात अजून एका कॅबिनेट मंत्र्याचे घोटाळे कागदपत्रांसह लोकांसमोर आणणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला.
परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांचे निकटवर्ती मानले जाणारे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या संदर्भातील एका याचिकेवर पुढील महिन्यात लोकायुक्तांसमोर आहे. दोन ते तीन आठवड्यात पहिली कारवाई होणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. अनिल परब यांचं अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. मग तरीही अनिल परब मंत्रिमंडळा कसे? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी केलाय.
शरद पवार सर्टिफिकेट देतात की भावना गवळी निर्दोष आहेत. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी अतिक्रमण करते, हैराण करते. तर भावना गवळी यांनी ४० वेळा बँकेतून पैसे काढले आहेत. २१ लाखापेक्षा कमी पैसे काढले नाहीत. रिसोर्स अर्बन क्रेडिट सोसायटीमधून पैसे काढले. अन् शरद पवार म्हणतात की ईडी चौकशी का करते? एकूण ११८ कोटींचा घोटाळा आहे. शरद पवारांना भावना गवळी यांना वाचवायचं असेल तर त्यांनी सांगावं, असा खोचक टोलाही सोमय्यांनी पवारांना लगावलाय.
कितीही हल्ले करा, मी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हास्यास्पद आहे. हे डाकूचं सरकार आहे, असा घणाघातही सोमय्या यांनी केलाय. त्याचबरोबर आठवड्याभरात ५-७ लोकांची झोपमोड होऊ द्या, मग तिसऱ्या अनिलचं नाव सांगतो, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे. त्यामुळे हा तिसरा अनिल कोण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सोमय्यांनी हल्ला चढवलाय. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? ६५ कोटी रुपयांत कारखाना घेतला आणि ७०० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. वैभव शिदे असं एका व्हॅल्युअरचं नाव आहे. शरद पवार यांना यासाठीच सहकार चळवळ हवी आहे का? असा सवालही सोमय्या यांनी केलाय. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दिलासा मिळाला आहे. त्याबाबत विचारलं असता आगे आगे देखो होता है क्या, असं सूचक वक्तव्य सोमय्यांनी केलंय.




