
टोक्यो : भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग यानं शुक्रवारी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह गटात कांस्यपदकासाठीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम मिन सू याच्यावर ६-५ असा विजय मिळवला. पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले. या पदकामुळे भारताच्या खात्यातील पदकसंख्या १३ अशी झाली आहे. आजच्या दिवसातील भारताचे हे तिसरे पदक ठरले. याआधी प्रवीण कुमारने उंच उडीत रौप्यपदक आणि नेमबाज अवनी लेखर हिनं कांस्यपदक जिंकले.