काश्मीर बिहारींकडे सोपवा, १५ दिवसांत परिस्थिती सुधारेल : मांझी

पटना : जम्मू काश्मीर दहशतवाद्यांकडून बाहेरील लोकांना टार्गेट करण्यावरुन बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरची जबाबदारी बिहारी लोकांवर द्यावी. १५ दिवसांत परिस्थिती सुधारुन दाखवू असा इशाराच त्यांनी दिला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवानांच्या दहशतवादविरोधी कारवायांना कंटाळून दहशतवाद्यांनी एकामागोमाग एक गैर काश्मीरी लोकांना निशाणा बनवलं आहे. रविवारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारच्या दोन मजुरांची हत्या केली. बिहारमध्ये राहणाऱ्या या मृत मजुरांचे नाव राजा आणि जोगिंदर असं होतं. शनिवारी दहशतवाद्यांनी पुलवामा आणि श्रीनगर येथे दोन लोकांची गोळी मारुन हत्या केली. श्रीनगरमध्ये राहणाऱ्या बिहारी अरविंद कुमारला निशाणा बनवण्यात आलं. तर पुलवामा येथील रहिवासी सगीर अहमद याचीही हत्या करण्यात आली.
या घटनांबाबत माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी ट्विट करुन सांगितलं आहे की, काश्मीरमध्ये वारंवार होणाऱ्या गरीब बिहारी लोकांच्या हत्येने मन व्यथित झालं आहे. जर परिस्थितीत बदल होत नसतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आग्रह आहे की, काश्मीरची जबाबदारी बिहारींवर द्या, १५ दिवसांत परिस्थिती बदलून दाखवू असं त्यांनी म्हटलं आहे.




