विजय मल्ल्या दिवाळखोर, ब्रिटनची घोषणा

लंडन: भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये पळून गेलेला किंगफिशरच्या विजय मल्ल्याला मोठा दणका बसला आहे. विजय मल्ल्याला लंडनच्या उच्च न्यायालयाने सोमवारी दिवाळखोर घोषित केले आहे. आता भारतीय बँका विजय मल्ल्याच्या मालमत्तांवर आरामात कब्जा करू शकणार आहेत.
मल्ल्याच्या विरोधात स्टेट बँकेच्या नेतृत्वात अन्य बँकांनी ब्रिटिश कोर्टात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. लंडनच्या उच्च न्यायालयाचा निकाल आलेला असला तरी देखील या निर्णयाविरोधात तो एक अपील करू शकतो. यामुळे मल्ल्याचे वकील लवकरच या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये विजय मल्ल्याला कर्ज देणाऱ्या बँकांनी त्याचे शेअर विकून ७९२.१२ कोटी रुपये मिळविले होते. स्टेट बँकेच्या नेतृत्वातील बँकांकडून डेट रिकव्हरी ट्रिब्युनलने मल्ल्याचे शेअर विकले होते. ईडीने हे शेअर जप्त केले होते. या शेअरमधून आलेला पैसा बँकांचे कर्ज रिकव्हर करण्यासाठी देण्यात आला आहे. ईडीने नुकतीच याची परवानगी डीआरटीला दिली होती.
भारतात मल्ल्या तीन केस लढत आहे. सर्वोच्च न्यायालयात मल्ल्याने सेटलमेंट ऑफर दिली आहे. तसेच जजमेंट डेटवर लावण्यात आलेल्या ११.५ टक्के व्याजावर मल्ल्याने आव्हान दिले आहे. तिसरी केस त्याला पळून गेलेला आर्थिक गुन्हेगार म्हणून त्याला घोषित केले होते, यावर लढत आहे.




