काँग्रेसची पडझड थांबण्याची आशा नाही; गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सोनियांना पत्र

पणजी: गोव्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला. तृणमूल काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत. नावेलीत कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर लुइझिन थेट पर्वरी येथील विधानसभा संकुलात आले आणि त्यांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला. यानंतर लुइझिन फालेरो यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले असून, यात त्यांनी आपली सल बोलून दाखवली आहे.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १७ जागा जिंकल्या. आम्हाला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा होता, पण आमच्या मतभेदांमुळे भाजपला बहुमत सिद्ध करता आले आणि आम्ही जनतेला निराश केले. या साडेचार वर्षांत मी पक्षाला एकत्र आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी हायकमांडचे दुर्लक्ष झाले, असे फालेरो यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आतापर्यंत आमच्या १३ आमदारांच्या पराभवाला कोणालाही जबाबदार धरले गेले नाही. ज्यांच्यासाठी आम्ही बलिदान दिले आणि लढलो असा काँग्रेस पक्ष आता गोव्यात राहिला नाही. आताचे लोक संस्थापकांच्या प्रत्येक आदर्श आणि तत्त्वाच्या विरोधात काम करत आहेत. नेत्यांचा एक गट लोकांचा विचार करण्यापेक्षा आणि त्यांचे भले करण्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक फायद्यांना प्राधान्य देत आहे. एकूणच आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. त्यामुळे म्हणूनच मला पक्षाची पडझड रोखण्यासाठी आणि चांगल्यासाठी बदल करण्याची कोणतीही आशा किंवा इच्छाशक्ती दिसत नाही, असे फालेरो यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार जिंकले. याशिवाय एक अपक्ष आमदारासह एकूण ४ आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा होता. त्यामुळे काँग्रेसकडे बहुमताचा आकडा असूनही दिग्विजय सिंह यांनी राज्यपालांकडे जाण्यापासून अडवले. तसेच आणखी ४ आमदारांच्या पाठिंब्यासाठी वाट पाहायला लावली, असे सांगत गोव्यातील काँग्रेसच्या आमदारांची संख्या १८ वरून ५ वर आली आहे. १३ आमदारांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, याला जबाबदार लोकांवर कोणतीही कारवाई झाली नाही, अशी खंत लुइझिन फालेरो यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.




