
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधला याचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन ते तिथे गेले होते, त्यामुळे ही चांगली बाब आहे, असं म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक केलं.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद. https://t.co/TDi4zXSy1o
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 9, 2021
दोन मोठ्या माणसाच्या भेटीत काय घडलं असले हे सांगता येणार नाही. वाघाची दुश्मनी आमची कधीच नव्हती. त्यांची जुनी मैत्री ही मोदींशी आहे. फडणवीस आणि पाटलांनी पटत नाही. जर आमच्याशी मैत्री असती तर १८ महिन्यांपूर्वी आमचं सरकार आलं असतं, असंही पाटील म्हणाले. या भेटीदरम्यान त्यांनी केलेल्या काही मागण्यांचं स्वागत करतो पण मराठा आरक्षण संबंधीची मागणी ही दिशाभूल करणारी आहे. केंद्राकडे आणि मोदींकडे आरक्षणाचा काहीच मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. पण, केंद्राने यावर मार्ग काढण्यास प्रयत्न करण्याचे सांगितलं आहे. पण मराठा आरक्षण आणि केंद्राचा काहीच संबंध नाही तो राज्य सरकारचा अधिकार आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
मराठा समाजाला मागास असल्याचे दाखवावे लागणार आहे. जर गायकवाड समितीचा अहवाल रद्द झाला नसता तर राज्य सरकारला अधिकार आहे की नाही हा मुद्दा आला असता. राज्याला अधिकार असले काय आणि केंद्राला अधिकार असले काय, मराठा समाज हा मागास आहे, हे दाखवावेच लागणार आहे, राज्य सरकारने मागास वर्ग आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण द्यावं. त्यासाठी सरकारला खूप मेहनत घ्यावी लागेल उगीचं केंद्राकडे जाऊन जनतेची दिशाभूल करू नये. त्यामुळे सरकारकडून ही धूळफेक झाली आहे, असंही पाटील म्हणाले.
मोदींनी लसीकरण मोफत केल्याने राज्य सरकारचे सहा हजार कोटी वाचणार आहेत त्यापैकी ३ हजार कोटी मराठा समाजाला पॅकेज म्हणून द्यावेत, अशी मागणीही पाटील यांनी केली.




