Top Newsअर्थ-उद्योगराजकारण

नोटबंदीमुळे उद्योगधंदे बंद, कोट्यवधी बेरोजगार, अर्थव्यवस्था उद्धवस्त; काँग्रेस, राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मुंबई : पाच वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे प्राण गेले, लाखो उद्योगधंदे बंद झाले, कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटल्याप्रमाणे नोटाबंदी ही संघटीत लूट असून यामुळे जीडीपीत मोठी घसरण होईल हे आता सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नोटबंदीमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. मोदीजी, आम्ही विचारत आहोत की तो कोणता चौक आहे आणि देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी, अशी विचारणा नवाब मलिकांनी केली आहे.

पाच वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे निर्णय घेऊन हुकुमशहाप्रमाणे देशावर नोटबंदी लादली. त्या काळ्या दिवसाला ५ वर्ष झाली आहेत. हा निर्णय घेताना नोटाबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद, बनावट चलनी नोटा संपतील अशा थापा मारून देशाची दिशाभूल केली होती, या शब्दांत नाना पटोले यांनी टीका केली.

प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे उद्योग व्यवसाय छोटे व्यापारी आणि रोजगार संपले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्याचे आपण सर्व पहात आहोत. नोटाबंदीमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. देशाचा जीडीपी निचांकी पातळीवर पोहोचला. अनौपचारीक क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

नोटाबंदीमुळे देशातील जनतेला प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ५० दिवसांत सारे काही आलबेल होईल. त्याला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत पण देशाची अर्थव्यवस्था आणि सामान्य माणूस यातून सावरला नाही. नोटाबंदीचे जे उद्देश पंतप्रधानांनी सांगितले होते, त्यातला एकही सफल झाला नाही. उलट अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यामुळेच भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. देशात काहीही चांगले झाले तरी आपल्यामुळेच झाले असे सांगून प्रत्येक गोष्टींचे भांडवल करून श्रेय लाटणा-या मोदींनी आपल्या घोडचुकीबद्दल देशाच्या जनतेची माफी मागावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मोदीजी, देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी? : नवाब मलिक

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आता ५ वर्षे पूर्ण होत आहेत. यावरून पुन्हा एकदा विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर नोटबंदीवरून टीकास्त्र सोडले. नोटबंदीमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. नोट बदलण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागले होते, अनेकांचा त्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर मोदीजी म्हणाले होते की, मला तीन महिन्यांचा वेळ द्या. पण पाच वर्षे झाली ना काळा पैसा नष्ट झाला ना भ्रष्टाचार, ना दहशतवाद संपला, या शब्दांत नवाब मलिक यांनी नोटबंदीवर टीका केली.

नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था हादरली. आज या निर्णयाला पाच वर्षे झाली. मोदीजी, तुम्ही त्यावेळी म्हणाला होता की, मला भर चौकात शिक्षा द्या. मोदीजी, आम्ही विचारत आहोत की तो कोणता चौक आहे आणि देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी, अशी घणाघाती टीकाही मलिक यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button