बारावीच्या परीक्षेबाबत देशात एकच धोरण निश्चित करा; उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारने दहावीच्या परीक्षांचा निर्णय घेतला. त्यानुसार मुल्यांकन करुन त्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे. त्याप्रमाणेच बारावीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. मात्र, यासाठी देशभरात एक धोरण असावं. म्हणून पंतप्रधान मोदींनी भारतासाठी एक परीक्षा धोरण करावं, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, दहावीच्या परीक्षांबाबतीत आपण निर्णय घेतलाय. यावर्षी 10 वीची परीक्षा न घेता आपण मुल्याकन करुन त्या त्या प्रमाणे पास करणार आहोत. बारावीचा देखील निर्णय घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षांचाही आपण आढावा घेत आहोत. त्यासाठी काय पद्धत ठरवता येईल ती ठरवून लवकरात लवकर हाही निर्णय घेणार आहोत. बारावीच्या परीक्षेवर पुढचं शिक्षण अवलंबून असतं. यात नीटची, इंजिनियरींगच्या परीक्षेचा समावेश आहे. इतर राज्यात जाऊन शिकण्याची वेळ येते. त्यासाठी केंद्र सरकारने देखील एक धोरण ठरवायला पाहिजे.
ही परिस्थिती संपूर्ण देश नव्हे जग ग्रासून टाकणारी आहे. १०० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती आली होती. त्यानंतर आता ही परिस्थिती आली. याला आपण आज तोंड देतो आहे. ज्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आणि पुढील शैक्षणिक गोष्टींवर परिणाम करणार आहेत त्याबाबत पंतप्रधान मोदींनी देशासाठी धोरण ठरवावं अशी विनंती करतो. मी या आधीही ही मागणी केली होती. बोलायचं असेल तर बोलेल, पत्र पाठवायचं असेल तर तेही मोदींना पाठवेल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
बारावीच्या परीक्षा किंवा इतर परीक्षा ज्यांचे देशात पडसाद उमटणार असतील त्यासाठी देशात एक शैक्षणिक धोरण असायला हवं. हा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. केंद्र सरकारने आम्हाला मार्गदर्शन करावं. दहावीचा निर्णय आम्ही घेतला, बारावीचा पण आम्ही घेणार आहोत. पण तो निर्णय देशभर सारखा पाहिजे. नाही तर एका राज्यात परीक्षा होईल आणि एकात नाही. यात विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? यात एक समानता असली पाहिजे, असंही ठाकरेंनी नमूद केलं.




