‘आयपीएल’च्या फॉरमॅटमध्ये बदल; बीसीसीआयला ८०० कोटींचा फायदा !

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (‘आयपीएल’) पुढील पर्वात दोन नवीन संघ सहभागी होतील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आयपीएल २०२२ च्या पुढील पर्वात सामन्यांची संख्या वाढण्याची शक्यताही बळावली आहे. पण, बीसीसीआय ९४ सामन्यांच्या विंडोसाठी तयार नाही. आयपीएल ६० दिवसांत ७४ सामने खेळवण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे आयपीएल २०२२ पुन्हा २०११च्या पर्वातील फॉरमॅटप्रमाणे खेळवण्यात येणार आहे. सध्याच्या फॉरमॅटनुसार प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध होम-अवे असे दोन सामने खेळतो, परंतु २०२२ मध्ये दहा संघांची ५-५ अशा दोन गटांत विभागणी केली जाणार आहे.
दहा संघांची ५-५ अशा दोन गटांत विभागणी. गटातील पाच संघ एकमेकांविरुद्ध होम-अवे असे प्रत्येकी दोन सामने खेळणार. साखळी गटातील गुणानुसार प्रत्येक संघाची क्रमवारी ठरवली जाईल. प्ले ऑफचा फॉरमॅट तोच राहील. एक एलिमिनेटर आणि दोन क्वालिफायर सामन्यानंतर फायनल संघ ठरवले जातील.
आयसीसीच्या दरवर्षी एका स्पर्धेचा प्रस्ताव मान्य करताना बीसीसीआयनं आयपीएलसाठीच्या विंडोत वाढ पदरात घातली. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयला आयपीएलच्या पर्वासाठी अधिक वेळ मिळणे अपेक्षित आहे, परंतु बोर्ड व ब्रॉडकास्टर यांना ९४ सामने नको हवेत आणि त्यामुळे फॉरमॅटमध्ये बदल करून ७४ सामन्यांची स्पर्धा खेळवण्यावर एकमत झालं आहे. ९४ सामन्यांच्या आयोजनासाठी आम्ही तयार नाही. ब्रॉडकास्टर्सही यासाठी तयार नाहीत. तसेच पदरेशी खेळाडूंच्या सहभागाचाही प्रश्न आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या विंडोचा विचार केला जाईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.
आयपीएल २०२२ च्या पर्वात दोन नव्या संघांची भर पडणार आहे. डिसेंबर महिन्यात त्यासाठी लिलाव होणार आहे. प्रत्येक संघाला चारच खेळाडूंना करता येणार रिटेन. ५४ दिवसांची विंडो ६० दिवसांची होणार. १४ अतिरिक्त सामन्यांमुळे बीसीसीआयला ८०० कोटींचा फायदा. दोन नवीन फ्रँचायझींना मोजावे लागतील प्रत्येकी २००० कोटी.