राजकारण

महागाई, कोरोना प्रश्नावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपाचा डाव !

भाजपा बहुजन समाजविरोधी पक्ष; मुंडे, खडसेंचा वापर करुन डावलले : : नाना पटोले

मुंबई : पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य जनता महागाईने बेहाल झाली आहे आणि मोदी सरकार देशाला लुटायचे काम करत आहे, त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून सामान्य माणसांसाठी संघर्ष करत आहे. मोदी सरकार लसीकरणात अपयशी ठरले आहे, चीनी सैन्याने घुसखोरी केली आहे. या महत्वाच्या प्रश्नावर मोदी सरकार चकार शब्द काढत नाही. काँग्रेस या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवत असताना भाजपा जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून दुसरीकडे वळवत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी असून या समाजातील लोकांचा ते वापर करुन नंतर त्यांना बाजूला करते याचा वारंवार अनुभव आलेला आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपाने वापर करुन नंतर त्यांना डावलले. खडसे यांना बदनाम केले गेले, झोटींग समितीचा अहवाल गहाळ झाला अशा बातम्या येत आहेत. खडसेंना बदनाम करण्यासाठीच घोटाळ्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते असा संशय येतो. भाजपा हा बहुजन समाज विरोधी असून त्यांच्यामुळे ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही कोर्टात रद्द झाले आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा भाजपा आटोकाट प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश आले नाही. याचाच एक भाग म्हणून मविआ सरकारच्या विरोधात सुरुवातीपासून बदनामीची मोहीम राबवली गेली. १०० कोटी रुपयांचे वसुलीप्रकरण त्यातीलच एक असून ज्यांनी आरोप केला त्या परमबीरसिंग व सचिन वाझे यांची चौकशी का केली जात नाही. अंटिलिया बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या, हा मुख्य मुद्दा असताना त्याचा तपास केला जात नाही, हे सर्व स्क्रिप्टेड असून त्याप्रमाणेच होत आहे, असे पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button