विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस आ. संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या ५ आणि ६ जुलैला होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अशावेळी काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावं शर्यतीत आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे संग्राम थोपटे. संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. थोपटे आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने, संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनावर हल्ला केला होता. आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पुण्यातील काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली होती.




