कोरोनाचे संकट संपताच महाराष्ट्र दौरा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा मुंडेंची घोषणा

बीड : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जोरदार राजकारण रंगलंय. भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसींचं आरक्षण परत मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार केलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावरील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं त्यांनी आज जाहीर केलंय.
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते डाक पाकिटाचं अनावरण करण्यात आलं. गोपीनाथ गडावरुन आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावरुन पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर तोड डागली.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले. pic.twitter.com/RNHrby8cCL
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 3, 2021
गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावरुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मुंडेसाहेब आज असते तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. पण आज मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. ओबीसी समाजाला न्याय मिळायला हवा. न्याय मागणारा पेटून उठला की न्याय मिळतो. कोरोनाचं संकट दूर झाल्यावर महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावरुन केलीय.
पंतप्रधानांना पत्र लिहिणार
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याची माहिती पंकजा यांनी यावेळी दिली. त्यात ओबीसींची जनगणना करा, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ज्याला रोजगार नाही त्याला रोजगार द्या, अशा ३ आशयाचं पत्र आपण पंतप्रधानांना लिहिणार असल्याची त्यांनी सांगितलं.
गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची हिंमत झाली नसती : फडणवीस
महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाय. त्याचबरोबर आमच्या नेत्याचं डाक पाकीट प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार त्यांनी मानले आणि गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.




