दिल्लीत ऑक्सिजनच्या अभावी २५ रुग्ण दगावले; ६० रुग्णांचा जीव धोक्यात

नवी दिल्ली: दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी २५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच रुग्णालयात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासत असल्याने ६० रुग्णांचा जीव धोक्यात आहेत.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गेल्या २४ तासात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एका वर्तमानपत्रानं दिलं आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. कारण रुग्णालयात केवळ दोन तास पुरेल एवढंच ऑक्सिजन होतं. मात्र, प्रचंड प्रयत्नानंतर या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.
दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपल्यानंतर या रुग्णालयातील रुग्ण इतर रुग्णालयात हलविण्यात आले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पत्रं लिहून राज्यातील रुग्णालयांतील ऑक्सिजनच्या साठ्याची माहिती दिली आहे. सरोज सुपर स्पेशालिटी रुग्णालय, शांती मुकुंद रुग्णालय, तीरथ राम शहा रुग्णालय, यूके नर्सिंग होम, राठी रुग्णालय आणि सँटम रुग्णायलायतील ऑक्सिजनचा साठा संपला आहे. त्याचवेळी गुरुवारी रात्री ८ वाजता गंगाराम रुग्णालयानेही केवळ पाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याचं सांगून चिंता व्यक्त केली होती.
केजरीवालांचं केंद्र आणि हरियाणा सरकारला आवाहन
दुसरीकडे आकाश हेल्थकेअरमध्येही अवघे काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. आकाश हेल्थकेअरचे सीईओ कौशर शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात २०० रुग्ण आहेत आणि ऑक्सिजन फक्त दीड तास पुरेल एवढाच शिल्लक आहे. दिल्लीमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये हीच स्थिती आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारशी संवाद साधला आहे. या कठीण प्रसंगी आपल्याला एकत्र येत भारतीय म्हणून लढावं लागेल, असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय.



