जीएसटीचे पैसे आले आता विकास करून दाखवा; अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचे आव्हान

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्रालयाने महाराष्ट्राला जीएसटीचे 11 हजार 519.31 कोटी रक्कम वितरित केले आहे. त्यामुळे आता तरी महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम कोविडच्या उपाययोजना व राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी व प्रत्येक गोष्टींचे खापर केंद्र सरकावर फोडणे बंद करावं, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटीच्या थकबाकीपोटी 27 हजार कोटी येणे बाकी आहे, त्यामुळे त्याचा परिणाम यंदाचा राज्याच्या अर्थसंकल्पावर होईल असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार नुकताच केला, तर प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर खापर फोडायचे व जीएसटीच्या थकबाकीचे कारण सांगून आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम नेहमीच महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी घणाघाती टीकाही पाटील यांनी केली आहे.
गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्या चार महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2020 पासून राज्य व केंद्र शासित प्रदेशांना जीएसटीच्या पोटी 1 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत, असं स्पष्ट करतानाच चंद्रकांत पाटील म्हणाले की, अर्थ मंत्रालयाने देशातील 28 राज्ये व तीन केंद्र शासित प्रदेशांना जीएसटी परताव्याची रक्कम वितरित केली आहे. त्यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्याचप्रमाणे 2019-20मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जी एस टी परताव्याची रक्कम 19 हजार 233 कोटी देण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही, त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. राज्यातील कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसाठी नुकसान ग्रस्तांना मदतीसाठी निधी देता येत नाही असा दावाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमी केला होता, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.