कोर्टाने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता का?; नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते काय?, असा सवाल नवाब मलिक यांनी सीबीआयला विचारला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. सीबीआयला संशय असेल तर चौकशी किंवा धाडी टाकू शकतात शिवाय गुन्हा दाखल करु शकते. परंतु पहिल्या दिवसापासून ज्यापध्दतीने हे प्रकरण तयार करण्यात आले आहे, यावरुन हे राजकारणच सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देऊन अहवाल सादर करायला सांगितले होते. परंतु ज्यापध्दतीने सीबीआयने धाडसत्र सुरू केले आहे त्यावरुन मुंबई उच्च न्यायालयासमोर सीबीआयने प्राथमिक अहवाल ठेवला आहे का? कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय किंवा आदेश दिला आहे का? याबाबतची माहिती समोर आलेली नाही किंवा आमच्याकडे उपलब्ध नाही, असेही ते म्हणाले.
कायद्यापुढे कुणीही मोठा नाही. देशमुख यांनी सुरुवातीपासून सीबीआय चौकशीला सहकार्य केले आहे. घटना ही अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची आहे. त्यामध्ये आजपर्यंत सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होता. याबाबत एनआयएने खुलासा केलेला नाही. याशिवाय यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका काय होती? त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे राजकारण सुरू आहे, असंही ते त्यांनी सांगितलं.




