
जयपूर: गेल्या काही दिवसांपासून राजस्थान भाजपमधील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत असून, वसुधंरा राजे समर्थक अधिक आक्रमत होत असल्याची राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे. राजस्थानमधील भाजप प्रदेशाध्यक्षांवर नाराज असलेला गट पक्षालाच घरचा आहेर देताना पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर, जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात, असा अप्रत्यक्ष टोला भाजप नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
मी कुणालाही घाबरत नाही. चुकीचे चाललेय त्याविरोधात बोलायला हवे. कारण यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यांवर नेतृत्व लादले. जिथे जिथे नेते लादण्यात आले, तिथे तिथे भाजपचे सरकार गेले. जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात, असा टोला वसुंधरा राजे गटातील नेते रोहिताश्व शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. त्यांना पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
तीन वर्षे प्रदेशाध्यक्ष राहिल्यामुळे मुख्यमंत्री बनतील, असा गैरसमज सतीश पुनिया यांचा झाला आहे. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ज्या राज्यांवर नेतृत्व लादले, तिथे भाजपला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे जनतेच्या हिताचे काम करणाऱ्या स्थानिक नेतृत्वाकडे सुत्रे द्यायला हवीत. तेव्हाच राज्यांमध्ये भाजपची सरकारे येऊ शकतात, असे रोहिताश्व शर्मा यांनी म्हटले आहे.
केंद्राच्या कृषी कायद्यात अनेक त्रुटी आहेत. ज्या देशातील शेतकरी सुखी असतो, तो देश प्रगती करतो. एमएसपीमध्येही बदल करण्याची गरज आहे. ही धोरण कॉर्पोरेट्स हाऊसच्या हिताचीच आहेत. सरकारने कोणतेही धोरण ठरवताना त्याच्याशी संबंधित लोकांशी चर्चा केली पाहिजे. सरकारने पुढे यावे आणि शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे सांगत रस्त्यावर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन थांबवावे, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.
दरम्यान, आम्हीदेखील पक्षाचेच कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्षाच्या विरोधात नाही. नेतृत्वाला बाजूला सारून निवडणुका लढता येऊ शकतात का, वसुंधरा राजे यांना हटवून निवडणुका लढता येतील का, अशी विचारणा करत ३ महिन्यांनंतर वसुंधरा राजे टेक ओव्हर करतील, त्यांना कुणीही रोखू शकत नाही, असे रोहिताश्व शर्मा यांनी म्हटल्याचा एक ऑडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.




