
ठाणे : महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे चक्क तुटून पडली आहेत. तर पिंपळे यांच्या संरक्षणासाठी धावलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकाचेही एक बोट तुटले आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे.
ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत काही फेरीवाले फिरत होते. याच भागातील कासारवडवली नाक्यावर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या फेरीवाल्यांवर कारावाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या माथेफिरु फेरीवाल्याने पिंपळे यांच्यावर चाकूने अचानकपणे हल्ला केला.
अचानकपणे हल्ला झाल्यामुळे पिंपळे घाबरल्या. त्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी आपला डावा हात वर केला. याचवेळी फेरीवाल्याने धारदार शस्त्राने केकेल्या हल्यात पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटेच तुटून पडली. याआधी माथेफिरू फेरीवाला आक्रमक झाल्याचे समजताच पिंपळे यांचा सुरक्षारक्षक सतर्क झाला होता. फेरीवाल्याने हल्ला केल्यानंतर पिंपळे यांचा सुरक्षारक्षक मध्ये आला. यावेळी सुरक्षारक्षकचेही एक बोट तुटले आहे.
या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आधी जवळच्याच वेदांत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात होते. त्यानंतर सहायक आयुक्त कल्पिता पीपळे यांच्यासह त्यांच्या सुरक्षारक्षकाला ज्यूपिटर रुग्णलायात हलवण्यात आले आहे. तर अमरजित यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हल्ला झाल्याचे समजताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी या माथेफिरू फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हे थरारनाट्य भर रस्त्यात काही वेळे सुरू होते. मात्र त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली.
राज्यात कायद्याचे राज्य आहे का ? : आशिष शेलार
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करुन एका फेरिवाल्याने तीन बोटे तोडल्याची अत्यंत चिड आणणारी घटना आज ठाण्यात घडली.
राज्यात कायद्याचे राज्य आहे का? सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का?
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 30, 2021
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. “ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करुन एका फेरिवाल्याने बोटे तोडल्याची अत्यंत चीड आणणारी घटना आज ठाण्यात घडली. राज्यात कायद्याचे राज्य आहे का ? सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का ? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते !,” असा वार शेलार यांनी केला आहे.




