राम खांडेकर यांचे नागपुरात निधन

नागपूर : महाराष्ट्रानं आणखी एक पितृतुल्य व्यक्तिमत्व गमावलं आहे. राम खांडेकर यांचं दीर्घ आजारानं नागपुरात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन नातवंडं असा परिवार आहे. राम खांडेकर यांनी देशाच्या दोन महान नेत्यांसोबत काम केलं. त्यांचं काम सांभाळलं. त्यामुळेच अनेकांसाठी राम खांडेकर मार्गदर्शक होते. ते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
राम खांडेकर यांनी देशाचे माजी उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री तसंच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलं. त्यामुळे यशवंतरावांची कामाची पद्धत, निर्णय घेण्याची क्षमता, त्यांचं कौटुंबिक आयुष्याबद्दल राम खांडेकरांना अनुभवातून मिळालेली माहिती होती. राम खांडेकरांनी त्याबद्दल विपुल लेखनही केलं. ‘सत्तेच्या पडछायेत’ नावाचं पुस्तक मराठी वाचकांनी आवर्जून वाचावं असं आहे. दिवाळी अंक तसंच लोकसत्ता ह्या वर्तमानपत्रासाठीही राम खांडेकरांनी लिखाण केलं. यशवंतराव-वेणूताई एक अद्वैत, अर्थमंत्री ते पररराष्ट्र मंत्री, पटनाईकी चाल, यशवंतरावांकडचे सण, नवी दिल्ली..संरक्षण मंत्रीपद, रत्नपारखी, कुशल प्रशासक, वरी चांगला, अंतरी गोड असे काही यशवंतरावांबद्दलचे लेख मुळातून वाचण्यासारखे आहेत. ते नेटवर उपलब्ध आहेत.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1402471794833952771
दोन असे नेते होऊन गेले ज्यांच्या काळात देशाला कलाटणी मिळाली. त्यापैकी एक नेहरु आणि दुसरे नरसिंहराव. इतर पंतप्रधानांची कारकीर्दही तेवढीच महत्वाची आहे पण इतिहास ह्या दोन नेत्यांच्या कारकिर्दीत बदलला. नरसिंहरावांच्याच काळात देशानं उदारीकरण स्वीकारलं. अनेक ऐतिहासिक निर्णय घ्यावे लागले. राम खांडेकर त्या निर्णयांचे साक्षीदार होते. कारण नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळेस राम खांडेकर त्यांचेही काम पाहू लागले. देशात ज्यावेळेस आर्थिक अस्थिरता होती त्याकाळात राम खांडेकर हे नरसिंहरावांच्या सर्वात जवळचे मानले गेले. नरसिंहरावांच्या कारकिर्दीबद्दलही राम खांडेकरांनी विपुल लेखन केलं आहे. आठवणी दाटतात, शापित नायकाची अखेर, राम मंदिर वाद आणि नरसिंह राव, सुधारणा पर्व, सौजन्यशील नेतृत्व असे काही खांडेकरांचे महत्वपूर्ण लेख नरसिहरावांबद्दलचे आहेत. तेही वाचण्यासारखे आहेत.




