
मुंबई : ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचं वातावरण निर्माण केलं. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केलं. इस्लाम धर्म भारतातून नष्ट होईल असं सांगितलं गेलं. पण तसं झालंय का? तर नाही. मुस्लिमांना आज सर्व स्तरांमध्ये हक्काचं स्थान आहे. ब्रिटिशांना जे हवं होतं ते त्यांनी त्यावेळी साध्य केलं. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवला आणि फोडाफोडी केली. आपल्याला आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वच एकच होते. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
मुंबईत आयोजित ‘राष्ट्रप्रथम-राष्ट्र सर्वोपरी’ कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचं काम केल्याचं म्हटलं आहे. भारतात हिंदूंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही. फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं, असं विधान भागवत यांनी केलं.
समजूतदार मुस्लिम नेत्यांनी कट्टरतावाद्यांविरोधात ठामपणे उभं राहिलं पाहिजे. हिंदू शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरचा आहे. याचा अर्थ इतर विचारांचा सम्मान न करणं असा होत नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्व नव्हे, तर भारतीय वर्चस्वाबाबत विचार करणं गरजेचं आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे, असं भागवत म्हणाले.




