Top Newsराजकारण

समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्याचे आदेश नाहीत; वळसे-पाटलांनी आरोप फेटाळले

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार पोलीस महासंचालकांकडे केली आहे. मात्र, वानखेडे यांचे हे आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाहीत, असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

वळसे पाटील आज पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वानखेडे यांच्या तक्रारीकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी हा खुलासा केला. वानखडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलही आदेश दिलेले नाहीत. अशी कुणावर काही पाळत ठेवली जात नाही, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.

राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना सीबीआयने नोटीस बजावली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. डीजीपी, मुख्य सचिव यांना समन्स पाठवल्याची मला माहिती नाही. सुबोध जयस्वाल यांना साक्षीसाठी बोलावलं आहे. रश्मी शुक्ला प्रकरणी साक्ष देण्यासाठी त्यांना बोलावलं आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच रश्मी शुक्ला या राज्यपालांच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याबाबतची माहिती आपल्याला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यामध्ये वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व पोलिस अधिक्षकांना, प्रमुखांना बोलवण्यात आलं आहे. यावेळी राज्यातील गुन्हेगारीचा आढावा घेऊन काही निर्देश दिले जातील. तसेच महिला अत्याचार रोखण्यावरही चर्चा केली जाणार आहे. लवकरच नवीन सूचना दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

वानखेडेंचे आरोप

दरम्यान, समीर वानखेडे यांनी पोलीस पाळत करत असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यांवरही टीका केली होती. एनसीबीने भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केलं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी एनसीबीने ज्या दिवशी क्रूझ पार्टीवर कारवाई केली त्यादिवशी काही भाजप नेतेही त्यांच्यासोबत होते, असा दावा मलिक यांनी केला. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ देखील दाखवत त्याचे पुरावे दिले होते. त्यामुळेच वानखेडेंवर पाळत ठेवली जातेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. याप्रकरणी स्वत: समीर वानखेडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

एक व्यक्ती मुंबई पोलीस दलातील अधिकारी

समीर वानखेडे यांच्या आईचं ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आलं होतं त्या स्मशानभूमीत ते नेहमी जातात. ते २०१५ पासून तिथे जातात. या दरम्यान दोन संशयित व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचं त्यांना सोमवारी (११ ऑक्टोबर) जाणवलं. विशेष म्हणजे त्यांनी पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेजही काढले आहे. त्यानंतर मुबंई पोलिसात तक्रार करत त्याचे सीसीटीव्ही फुटेज देत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी एक व्यक्ती ही मुंबई पोलीस दलात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेली व्यक्ती आहे, असं वानखेडे यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button