कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
नवी दिल्लीः राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. तसंच कोरोनाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासही सांगितलं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. प्राधान्य गट आणि आर्थिक उलाढालींच्या केंद्रांवर तातडीने लक्ष देत लसीकरणाच्या प्रभावी योजनेला प्राधान्य दिले जावे, असं भल्ला यांनी पत्रात म्हटलं आहे.
कोरोनाच्या व्यवस्थापनासंबंधी योग्य रणनीतीवर लक्ष द्यावे. निर्बंध हटवतानाची प्रक्रिया ही काळजीपूर्वक हाताळावी. कोरोनासंबंधी प्रभावी व्यवस्थापन म्हणजे टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि कोविड उपयुक्त व्यवहाराचे पालन या पंच सूत्रीवर जोर दिला पाहिजे, असं भल्लांना पत्रात नमूद केलं आहे.
राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी नियमितपणे १० लाख लोकसंख्येवर अॅक्टिव्ह रुग्णांची अधिक संख्या असलेल्या जिल्ह्यांवर देखरेख ठेवली पाहिजे. कारण हे आरोग्य यंत्रणेच्या पायाभूत सुविधेचा अंदाज घेण्यासाठी एक महत्त्वाचा संकेत आहे. आणि या संबंधी तातडीने कारवाई करता येऊ शकेल, पत्रात म्हटलं आहे.
कोरोनाची स्थिती आणि जिल्हा हॉस्पिटल्समधील बेड रिकामी असण्याच्या संख्येवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. तसंच आरोग्याच्या पायाभूत सुविधांची विशेष करून काळजी घेतली पाहिजे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अधिक आहे आणि हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नाहीत तिथे निर्बंध लागू केले पाहिजेत, अशी सूचना त्यांनी केली. अनेक राज्ये कोरोनासंबंधी निर्बंध आणि संचारबंदी हटवताना दिसत आहे. तसंच आर्थिक उलाढाल सुरू करत आहेत. या पार्श्वभूमीवर गृह सचिव अजय भल्ला यांचे हे पत्र आले आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे.




