संपूर्ण देशात लॉकडाऊनची शक्यता; केंद्र सरकार आज निर्णय घेणार!

नवी दिल्ली : देशात मागील चोवीस तासांत साडेतीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जवळपास पन्नास देशांमध्ये एका दिवसात मिळालेल्या रुग्णसंख्येपेक्षाही अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अत्यंत वेगानं होत असल्यानं तो रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनची मागणी कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी केली आहे. या सदस्यांमध्ये एम्स आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सामील आहे. यावर केंद्र सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.
या फोर्समधील सदस्य मागील एका आठवड्यापासून ही मागणी करत आहेत. ICMR चा असा अंदाज आहे, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अजून उच्चांक गाठलेला नाही. हा पीक आणखी बाकी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की या स्थितीमध्ये कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याासाठी दोन आठवड्यांचं लॉकडाऊन गरजेचं आहे.
सध्या दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि ओडिसामध्ये संपूर्ण लॉकडाऊन आहे. तर, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मिनी लॉकडाऊन आहे. उत्तर प्रदेशात विकेण्ड लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर, मध्य प्रदेशातही ७ मे पर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.




