
लंडन : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय टीम इंडियाच्या पथ्यावर पडला. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना इंग्लंडला पहिल्या डावात दोनशेपारही जाऊ दिले नाही. कर्णधार जो रूट वगळल्यास इंग्लंडचे अन्य फलंदाज भारतासमोर नांगी टेकून माघारी परतले. जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचला आहे आणि आता फलंदाजांच्या कामगिरीवर सामन्याचा निकाल अवलंबून आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी भारताला साजेशी सुरूवात करून दिली आहे. दोघांनी एकही विकेट न गमावता २१ धावा केल्या आहेत. भारत अजून १६२ धावांनी पिछाडीवर आहे. लोकेश व रोहित दोघंही ९ धावांवर नाबाद आहेत.
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात त्यांना धक्का दिला. रोरी बर्न्स पाचव्याच चेंडूवर पायचीत होऊन भोपळ्यावर माघारी परतला. त्यानंतर डॉम सिब्ली व झॅक क्रॅवली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद सिराजनं त्याची विकेट घेतली. क्रॅवलीला २७ धावांवर माघारी जावं लागलं. मोहम्मद शमीनं तिसरी विकेट घेताना डॉम सिब्लीला ( १८) बाद केले. त्यानंतर कर्णधार जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या डावाला आकार दिला.
जो रूट एकटा संघर्ष करत होता. विराटनं गोलंदाजीसाठी शार्दूल ठाकूरला पाचारण केलं अन् त्यानं त्या षटकात दोन धक्के दिले. जो रूटला पायचीत केल्यानंतर चौथ्या चेंडूवर ऑली रॉबिन्सन ( ०) सहज झेलबाद झाला. रुटनं १०८ चेंडूंत ११ चौकारांसह ६४ धावा केल्या. सॅम कुरननं फटकेबाजी करताना नाबाद २७ धावा काढल्या. बुमराहनं इंग्लंडची अखेरची विकेट घेतली. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गडगडला. जसप्रीत बुमराहनं चार, मोहम्मद शमीनं ३ व शार्दूल ठाकूरनं दोन विकेट्स घेतल्या.




