
मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षाबाबतीतील संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. दहावीच्या परीक्षा या १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा या ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
इयत्ता १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील. pic.twitter.com/i0wbWBE9H5
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
दोन वर्षांनंतर होणार दहावी-बारावीच्या परीक्षा
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते. ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. याबाबत वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेता आल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते.