शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता

कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले, शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात एकच गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्स तर सोडाच अनेकांच्या तोंडावर मास्क देखील नव्हते. विशेष म्हणजे लग्न समारंभासाठी वेळेची मर्यादा देखील आखुन दिली असताना वेळेच्या मर्यादेचंही उल्लंघन करण्यात आलं आहे.
कल्याण-डोंबिवलीत शनिवारी कोरोनाचा उद्रेक झाला. वर्षभरातून पहिल्यांदाच एका दिवसात 1244 रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सर्वसामान्य जनतेला नियम पाळण्याचं आवाहन केलं. कोरोना टाळण्यासाठी काय काय केले पाहिजे हे सांगितलं. त्यांनी यावेळी भाजपाला सुद्धा टोला लगावला. मात्र त्यांचेच पदाधिकारी, नगरसेवक मुख्यमंत्र्यांचं ऐचे कत नाहीत हे दिसून आलं आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वाले यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात मोठी गर्दी दिसून आली. आता प्रशासन काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे
सर्वांना नियम सांगणारे मुख्यमंत्री आता आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सांगणार? हा प्रश्न उभा राहिला आहे. एवढंच नाही तर डोंबिवलीमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसेच्या काही मोजक्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर कोपर आणि वडवली पुलाजवळ झालेल्या गर्दी संदर्भात गुन्हा कधी दाखल होणार? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आता या लग्न समारंभानंतर सेना- मनसेत जुंपणार हे नक्की.




