
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पवार त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी १५ पक्षांच्या नेत्यांसमवेत आज दुपारी ४ वाजता एक बैठक घेणार आहेत. पण या बैठकीसाठी शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपविरोधातील आघाडीपासून शिवसेना फारकत घेतेय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यावर आता शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शरद पवार आज दिल्लीत राष्ट्रमंचच्या सदस्यांसोबत बैठक घेत आहेत. ते देशाचे मोठे नेते आहेत आणि देशातील नेते विविधं विषयांसंदर्भात त्यांची भेट घेत असतात यात राजकीय, आर्थिक विषयांवर चर्चा होत असते. आजची बैठक सर्वपक्षीय विरोधकांची बैठक नाही. यात सपा, बसपा, वायएसआरसीपी, टीडीपी आणि टीआरएस देखील या बैठकीला उपस्थित नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवार दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांची आपल्या शासकीय निवासस्थानी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत तीन तासांहून अधिक काळ खलबतं झाली. त्यानंतर ‘राष्ट्रमंच’च्या नेतृत्वाखाली आज पवारांच्या निवासस्थानी देशातील १५ विविध नेत्यांची बैठक होत आहे. पण या बैठकीत काँग्रेसचेही सदस्य उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे शरद पवार बिगर काँग्रेस भाजपविरोधी महाआघाडीची चाचपण करत आहेत का अशी चर्चा सुरू झाली. पण राज्यात शिवसेना आता राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत असताना शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी का? असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर त्यावर संजय राऊत यांनी संबंधित बैठक विरोधकांची बैठक नसून राष्ट्रमंचच्या सदस्यांची असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.




