
मुंबई: येणाऱ्या काळात भाजपा भरवशाचं स्वत:चं सरकार आणून दाखवेल. कोरोना संकट काळात देखील महानगरपालिकेने भ्रष्टाचार करण्यात आपला पहिला नंबर लावला. कोरोना काळातही हे सरकार सपशेल तोंडावर पडलेले महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. शिवसेनेला भ्रम होता की भाजपा शिवसेनेच्या बळावर जिंकते. पण शिवसेनेचा भ्रमाचा भोपळा फुटला असून शिवसेना तोंडावर पडली असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबईत भाजपच्या सर्व प्रभाग, उपविभाग व जिल्हा प्रभारी यांच्या संयुक्त बैठकीत फडणवीस बोलते होते. २०२४ आधी राज्यात आपलं सरकार आल्यावर जनतेच्या कल्याणकारिता आणि विकासाकरिता आपण काम करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
“सेवा ही समर्पण” या अभियानांतर्गत मुंबई भाजप घरोघरी जाऊन मुंबईतील नागरिकांना मदत करत आहे. यासोबतच मुंबई भाजपने विविध समाजाकरिता चौपाल हे सामाजिक व्यासपीठ आयोजित केले आहे. त्याच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या, समजून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याचं मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भाजपा आपल्या १ लाख ४० हजार बूथ प्रमुखांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून लोकांना मदत करत आहे. मुंबईतील सर्वसामान्य जनतेला विविध समाजोपयोगी योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी पक्षाने आतापर्यंत प्रत्येक प्रभागात उत्तर भारतीय मोर्चा च्या माध्यमातून 500हून अधिक चौपाल सत्राचे आयोजन केले आहे. भविष्यात पाचशेहून अधिक चौपाल सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील मराठी माणसांना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यासाठी “मराठी कट्टा” हे व्यासपीठ आयोजित केले जात आहे. त्यात नागरिकांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निराकरण केले जाते. त्याचप्रमाणे विविध समाज गटांसाठी अनेक योजना व कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
नवरात्री सणाचे औचित्य साधत महिलांचा सन्मान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यांच मोहिमे अंतर्गत मुंबई शहरातील महिला स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली. तरुणांच्या भविष्याला योग्य दिशा मिळण्याकरीता “करिअर दिशा” या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते, अशा अनेक योजना मुंबई भाजपतर्फे आयोजित करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे लोढा यांनी सांगितले.




