राजकारण

केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा : शरद पवार

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच पवारांनी या भेटीवर खुलासा केला आहे. केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आली, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

ईडीने राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्याआधी पवार आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची भेट झाली होती. त्यानंतर लगेचच मोदींबरोबर भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा तपशील बाहेर न आल्याने या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात होते.

दरम्यान, शरद पवार यांनीच ट्विट करून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांशी माझी भेट झाली. या भेटीत राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असं पवारांनी स्पष्ट केलं. पवारांनी या ट्विटसोबत पंतप्रधानांना देण्यात आलेलं एक पत्रंही पोस्ट केलं आहे. बँकिंग अधिनियमामधील दुरुस्तीबाबतचं हे पत्रं होतं. त्यामुळे या भेटीत बँकिंग अधिनियमावरही चर्चा झाल्याचं स्पष्ट होत आहे.

बँकिंग दुरुस्ती विधेयकाचा उद्देश आणि तरतुदी आवश्यक आहे. मात्र, असं करताना संविधानात सहकाराबाबत निर्धारित करण्यात आलेल्या सिद्धांताला छेद तर देत नाही आहोत ना हे पाहिलं पाहिजे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने नव्याने सहकार खातं तयार केलं आहे. या खात्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी लिहिलेल्या या पत्राला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button