
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची जोरदार पाठराखण केली होती. त्यानंतर आता दोन्ही एकत्र येणार आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथिगृहात दुपारी १२.३० वाजता महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्याच बरोबर राज्य आता पुर्णपणे अनलॉक करून अर्थव्यवस्था पूर्णगतीने सुरू करणं गरजेचं झालं आहे. त्यातच कोविड संसर्गाची बाधा नियंत्रणात ठेवूनच राज्याची पुढील वाटचाल सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी महत्वाची चर्चा होणार आहे. त्याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांवर ईडीकडून अनेक कारवाया झाल्या आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि विरोधी पक्ष भाजप करत असलेल्या राजकारणावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले होते. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. तसंच, तुम्ही कितीही ईडी आणि सीबीआयची चौकशी लावा हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं कौतुक केलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार झाले, तेव्हा हे सरकार बनवण्यासाठी तिन्ही पक्षांचा हात होता. माझाही त्यात सहभाग होता. त्यावेळी आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी नेतृत्व कुणी करायचं तीन चार नाव समोर आली. त्यावेळी मी उद्धव ठाकरे यांचा हात धरून उंचावला आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे मी सांगितलं. पण, त्यावेळी उद्धव ठाकरे यांची हात उंचावण्याची तयारी नव्हती. त्यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी नव्हती. त्यांना सक्तीने हातवर करावा लागला, असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. तसंच, भाजपने किती छापे मारले, ठीक आहे, त्यांना किती कारवाई करायची आहे त्यांनी करावी, पण हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे. आणि पुन्हा सत्तेत येईल याची मला खात्री आहे, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता.




