Top Newsराजकारण

लोकलबाबत कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा झाली असेल, तर राज्यमंत्र्यांशी चर्चेची गरज नाही

संजय राऊतांच्या रावसाहेब दानवेंनी टोला

नवी दिल्ली: दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्यापूर्वी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती, असं विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. राज्य सरकारने लोकलबाबत कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा केली असेल. रावसाहेब दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना हा टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. आता लोकलसाठी कोणाशी चर्चा करायची? चर्चाच करायची असेल तर कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करू. दानवेंशी चर्चा करायची गरज नाही, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

आज संसदेत घटना दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. घटनादुरूस्ती झाली की लगेच आरक्षण मिळणार आहे का? त्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ही काढावी लागेल. हा खाऊ उगाच दाखवण्यासाठी आहे. असा फसवा खाऊ काय कामाचा?, अशी टीकाही त्यांनी केली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याचं स्वागतच आहे. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे येत्या १५ ऑगस्टपासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू. कोरोनाची स्थितीही आता आटोक्यात आली आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

रेल्वेची भूमिका स्पष्ट आहे. प्रवासी तपासून आत सोडण्यात येईल. आम्ही लोकल सुरू करण्यास सज्ज आहोत. मात्र, प्रवाशांचे प्रमाणपत्रं तपासण्यासाठी राज्य सरकारनेही स्वत:ची यंत्रणा उभी केली पाहिजे. ही राज्याचीही जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. आमची कसली नाराजी नाही. उलट आम्ही खूश आहोत. ज्या अडचणी येतील त्या चर्चेतून सोडवता आल्या असत्या, असंही दानवे म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button