वरुण सरदेसाई भाचा आहे म्हणून सूट देताय का? मनसेचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशावेळी दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांकडून आज ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे बाळा नांदगावकरांसह मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक सवाल केलाय. वरुण सरदेसाईवरुन गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? असा सवाल देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय.
राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दहीहंडी ठिकठिकाणी साजरी केली. मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात. मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत? आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितलं नाही? वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? अशी प्रश्नांची सरबत्तीच संदीप देशपांडे यांनी केलीय. एकेकाळी रँड नावाचा अधिकारीह असा वागायचा. त्यावेळी चाफेकर बंधुंनी आवाज उठवला तशीच वेळ आता आली आहे. मुख्यमंत्री म्हणतात हे स्वातंत्र्ययुद्ध आहे का? तर हो… हे स्वातंत्र्ययुद्धच आहे, असंही देशपांडे म्हणालेत. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यावर बोलताना राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार आम्ही आंदोलन करु असंही देशपांडे म्हणाले.




