
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.
या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफ च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे. ही मदत खालील प्रमाणे राहील…
– जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
– बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
– बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर
– ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
विरोधकांचा ठाकरे सरकारवर वार
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय. पण जवळपास दोन महिने झाले तरी राज्य सरकारकडून मदतीची घोषणा होत नाही, असं म्हणत विरोधकांकडून वारंवार टीका केली जात होती. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशाराच दिला होता. शेतकऱ्यांचा दसरा अंधारात गेला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी थेट राज्य सरकारला उद्देशून म्हणाले होते. याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारला शेतकरी मदतीवरुन घेरलं होतं. दुसरीकडे राज्य सरकारकडून पंचनाम्याचं कारण दिलं जात होतं.
राजू शेट्टींना अजित पवारांचे उत्तर
शेतकऱ्यांचा दसरा कडू झाला तर नेत्यांना दिवाळी गोड करू देणार नाही असे राजू शेट्टी म्हणालेत.यासंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी महाराष्ट्रातलं साखर कारखान्यांचं गणित सांगितलं. मागच्या वर्षीची रिकव्हरी काय आहे हे पाहून आपण एफआरपी देतो. एक टक्का साखर वाढली तर १० किलोला टनामागे ३०० रुपयांचा फरक पडतो, असे वाटते. गुजरातमध्ये तीन टप्यात पैसे दिले जातात, त्यामुळे गुजरात राज्यातील शेतक-यांना ५०० ते ६०० रुपये टनाला जास्त भाव मिळतो, साखरेचं पोत तयार झाले की १ रुपये व्याज सुरु होते, हे व्याज शेतक-यांच्याच पैशातून दिलं जातं. १५ तारखेला कारखाने सुरु होतायत, दहा कोटी रुपयांची साखर पडून आहे, म्हणजे दररोज रोज दहा लाख रुपये व्याज सुरु होत आहे, याचा भुर्दंड पडतो. आर्थिक प्रश्न आहेत, चर्चा सुरु आहेत, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्यांच्या पध्दतीने सागंतायत त्याबाबत चर्चा करुन निर्णय घेता येईल, असं अजित पवार म्हणाले.




