फोकस

राज्यात पुढील ५ ते ६ दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या वतीनं हवामानाचा सुधारित अंदाज जारी करण्यात आला आहे. सुधारित अंदाजानुसार राज्यात पुढील पाच ते सहा दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या पावसानं हजेरी लावली आहे. रविवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला. मराठवाड्यातील काही ठिकाणी देखील जोरदार पाऊस झाला. त्यानंतर आता भारतीय हवामान विभागानं पुढील पाच ते सहा दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

मान्सूनचा पाऊस येत्या ५ ते ६ दिवसांमध्ये रौद्र रुप धारण करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्याचा प्रदेश. मध्य महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं दिला आहे. पुढील ५ ते ६ दिवसांमध्ये या भागात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारपट्टीवर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती येत्या ३-४ दिवस कायम राहू शकते. गुजरात आणि त्याच्या जवळपासच्या प्रदेशात वादळसदृश्य स्थिती राहू शकते. २३ जुलैपर्यंत उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र कायम राहू शकते.

ऑरेंज अ‍ॅलर्ट

२०, २१ आणि २२ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूरला ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस दमदार हजेरी लाऊ शकतो.

यलो अ‍ॅलर्ट

२० जुलै रोजी अमरावती आणि नागपूर तर २१ जुलै रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली आणि २२ जुलै रोजी भंडारा आणि गोंदियाला यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. यलो अ‍ॅलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ, शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button