
मुंबई: राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात ६१०० जागा भरण्यात येणार आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा तब्बल दोन वर्षांनतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. दोन वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे. २०१८-१९ मध्ये शेवटची परीक्षा झाली होती. कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी ७ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या गॅपमुळे १० लाख यावेळी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे.
साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक १ ली ते ४ थी आणि ५ वी ते ८ वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.