
मुंबई : होमगार्डचे महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे कोणाचीही परवानगी न घेता मुंबईतून परदेशात पळून गेल्याचा सर्वांचा संशय आहे. एक महासंचालक दर्जाचा अधिकारी देशाबाहेर जायचे असेल तर वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र परमबीर सिंग यांनी गृहमंत्री म्हणून माझी किंवा राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची परवनागी घेतली नाही. असे धक्कादायक विधान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
आतापर्यंत परमबीर सिंग यांना ५ समन्स पाठवण्यात आले असून नॉन बेलेबल वॉरंटही त्यांच्या नावाने पाठवण्यात आले आहे. तसेच लूकआऊट नोटीस त्यांना पाठवण्यात आली असून त्यांच्या मुंबई आणि चंदीगढ येथील घर बंद असल्याचे सीआयडी पथकाच्या तपासात निष्पन्न झालं आहे. गेल्या काही दिवसात परमबीर सिंग हे नॉन रिचेबल असून ते कोणाच्याही संपर्कत नाही त्यामुळे ते मुंबई महाराष्ट्र मधून परदेशात पळून गेल्याचा संशय पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात असून सिंह यांनी चौकशीला सामोरे जावे असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांची होमगार्डच्या महासंचालक पदी बदली झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटी हप्ता वसूलीचे टार्गेट दिले होते असा लेटर बॉम्ब ठाकरे सरकारवर टाकला होता. त्यानंतर ६ हून अधिक प्रकरणात परमबीर ३ पोलीस उपायुक्त आणि डझनभर पोलीस अधिकारी यांच्या सिंडिकेटबद्दल राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये धमकावणे आणि खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
१०० कोटीच्या वसुली प्रकरणात न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी करत असून आतापर्यंत त्यांनी ५ समन्स पाठवले आहेत. एनआयएने नुकतचे दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह आणि एंटीलिया येथील जिलेटीनच्या कांड्या सापडल्यामध्ये अनेक प्रश्न परमबीर सिंग यांच्या कार्यपद्धतीवर निर्माण केले आहेत.
परमबीर सिंग हे होमगार्डचे महासंचालक असून १ मे पासून ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रकृतीच्या कारणास्तव दीर्घकालीन रजेवर होते. रजा संपल्यानंतर त्यांनी १ सप्टेंबरपासून कार्यालयात पुन्हा रुजू होणे अपेक्षित होते. मात्र आज १ महिन्यानंतरही परमबीर सिंह कुठे आहेत. याबाबत कोणालाच थांगपत्ता नसल्याने अखेर राज्यातील गृहविभागाने केंद्राची मदत घेण्याचे ठरवले आहे. यापूर्वी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्यासह २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबणाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यामांत येत असलेल्या बातमीवरुन संशय व्यक्त केल्याने परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंह फरार असून ही खूप गंभीर बाब आहे. पोलीस परमबीर सिंग यांना शोधत आहेत. सिंग यांनी चौकशीला सामोरे जावे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
गृहविभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते परमबीर सिंग हे त्यांना पहिले समन्स देण्याअगोदरच देशाबाहेर पळाले आहेत. ते चंदीगढमधून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळून गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना पळून जाण्यासाठी केंद्र सरकारने एक प्रकारे मदत केली काय असे आता बोलले जात आहे.