
मुंबई: नववर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रीक होणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.
राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक होणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. खरंतर राज्य सरकारने हा निर्णय याआधीच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी १ जानेवारी २०२२ पासूनच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
I’m grateful to CM Uddhav Thackeray ji, DCM Ajit Pawar ji and RM Balasaheb Thorat ji for their support to @MahaEnvCC ’s ambitious climate action policies to ensure the Govt actions further encourage citizens for climate mitigation, adaptation and resilience actions
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 2, 2022
आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर माहिती देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. आपल्या या निर्णयाला पाठींबा दिल्याबद्दल त्यांनी तीनही ज्येष्ठ मंत्र्यांचे आभार मानले आहेत. पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणात मागील काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. देशपातळीवरही प्रदुषण रोखण्यासाठी मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर जोर दिला जातोय. इलेक्ट्रीक वाहनांचे मार्केटही सध्या झपाट्याने वाढत आहे. विविध कंपन्या या इलेक्ट्रिक वाहने बनवत आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मोठी घोषणा केली होती. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात लवकरच क्रांती होईल, असा सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सध्या देशभरात चांगलाच लोकप्रिय होत आहे. सतत नवनव्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्स लाँच केल्या जात आहेत.




