Top Newsराजकारण

एनडीए टू यूपीए प्रवास झालेला नाही, शिवसेनेचा मार्ग स्वतंत्र : संजय राऊत

नवी दिल्ली : शिवसेनेचा एनडीए टू यूपीए प्रवास झालेला नाही, शिवसेनेचा प्रवास हा स्वतंत्र सुरु आहे, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राजधानी दिल्लीत आज सांगितलं. शिवसेना सत्ताधारी एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर विरोधी पक्षांसोबत सातत्याने दिसत आहे. अनेकवेळा संजय राऊत यांनी तिसऱ्या आघाडीची भाषा देखील केली. मात्र, शिवेसेना कोणत्याही आघाडीत सामिल झालेला नाही आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

राऊत यांनी पत्रकार परिषदत घेत शिवसेना यूपीएमध्ये सामिल झालेली नाही, असं स्पष्ट केलं. दरम्यान, सोमवारी संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या पेगाससच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत होते. तिथे त्यांनी पेगाससवरुन केंद्रावर टीकास्त्र डागलं. यावरुन संजय राऊत यांना एनडीए टू यूपीए प्रवास झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, शिवसेना अधिकृत यूपीएचा भाग झालेली नाही. ती पत्रकार परिषद संयुक्त विरोधी पक्षाची होती. अर्थात राहुल गांधी हे नेते आहेत, मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी आम्हाला विजय चौकात पेगासस प्रकरणी पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केलं. राहुल गांधी मला घेऊन गेले हे खरं आहे. विरोधी पक्ष यावेळी कमालीचा एकजूट दिसतोय. नितीश कुमार आणि बिहारचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा आमच्या सुरात सूर मिसळून पेगाससची चौकशी व्हावी अशी मागणी केली त्याचं आम्ही स्वागत करतो. मात्र, आमचा एनडीए टू यूपीए असा प्रवास झालेला नाही. अजून आम्ही कुठेही नाही. शिवेनाचा प्रवास हा स्वतंत्र मार्गाने सुरु आहे. पण आम्ही महाराष्ट्रामध्ये एकत्र सरकार चालवतोय आणि दिल्लीत आम्ही विरोधी पक्षांच्या सोबत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

ठाकरे सरकार कोणत्याही ओझ्याने पडणार नाही

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही ओझ्याने पडणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. सरकार अगदी फुलपाखराप्रमाणे मस्त उडत चाललं आहे. सरकार आपल्या पायावर अत्यंत मजबूतीने उभं आहे याची खात्री राहुल गांधी आणि शरद पवार यांना आहे. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील आहे, असं संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली, खूप गोष्टी समजून घेतल्या, मोकळेपणाने त्यांनी समजून घेतल्या. महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी मी त्यांना नविन माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ती समजून घेतली, एकंदरीत चर्चा छान झाली आणि अधूनमधऊन आम्ही भेटत राहू असं आमचं ठरलंय. निरोप घेताना लवकरच महाराष्ट्रात येईन, असं संजय राऊत यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रीय सुरक्षेसंबंधात प्रश्न घेऊन आलोय, पण केंद्र सरकार चर्चेपासून पळ काढतंय, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्रावर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button