राजकारण

इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदी सरकारवर संताप

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा भडका उडाला आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनलेय, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना ही घणाघाती टीका केली. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविल्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

यावेळी मलिक यांनी कोरोना संसर्गावरूनही केंद्र सरकारवर टीका केली. साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. लस पुरवठा होत नाहीये. ठिकठिकाणी लोकं गर्दी करत आहेत. जबाबदारी स्वीकारल्यानंतर जबाबदारी पार पाडण्याची, नियोजनाची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय कशाला जाहीर करताय, असा संतप्त सवाल त्यांनी केंद्राला विचारला आहे.

नवीन लोकांना डोस द्यायला लस उपलब्ध नाहीय. आधी जाहीर करायचं. लोकांमध्ये वेगळं वातावरण निर्माण करायचं आणि प्रत्यक्षात लोकांना लसच उपलब्ध नाही. हा मोदी सरकारचा ढिसाळ कारभार आहे, अशी टीका करतानाच केंद्रसरकारने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी व टास्क फोर्स निर्माण करावा. आपत्ती व्यवस्थापनसाठी एका नेत्याची निवड करावी. त्याच्या माध्यमातून कोरोना परिस्थिती हाताळावी. जर असं केलं नाही तर देशातील परिस्थिती आणखी हाताबाहेर आणखी जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button