Top Newsराजकारण

कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’चा प्रयत्न; राष्ट्रवादीची टीका

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ वाराणासीतील डॉक्टरांशी आज संवाद साधला. वाराणीसीने कोरोना रोखण्यात यश मिळविल्याचं कौतुक मोदींनी यावेळी केलं. त्यावर राष्ट्रवादीने टीका केली आहे. कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठीच देशातील कोरोना रोखण्यात ‘बनारस मॉडेल’ उत्तम असल्याचा प्रचार केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. बनारसच्या घाटावरील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. लोकांनी मृतदेह गंगा नदीत टाकले. या घटनेची देशभर आणि जगभर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘बनारस मॉडेल’ बनवण्यासाठी जिल्हाधिकारी, डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा केली. देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ‘बनारस मॉडेल’ चा प्रचार करण्यात येत आहे. कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी हा प्रयत्न आता केला जातोय, असा दावा मलिक यांनी केला आहे.

मात्र ‘बनारस मॉडेल’ असा काही प्रकारच नाही. बनारसमध्ये ना टेस्टींग होत होती, ना उपचार होत होते. औषधांचा काळाबाजार झाला. ऑक्सिजन काळयाबाजाराने विकला गेला. ‘बनारस मॉडेल’ हे ‘निदान मॉडेल’ सारखे फेल गेले आहे. त्यामुळे बनारस मॉडेलचा प्रचार बंद करा, असंही ते म्हणाले.

मोदींचा संवाद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहा:कार माजवलेला असतानाच तिसऱ्या लाटेचं संकटही घोंघावू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणासी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाले होते. तिसऱ्या लाट भयंकर आहे. त्यामुळे या लाटेत लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला मोदींनी या डॉक्टरांना दिला. आपण वाराणासीमध्ये कोरोना रोखण्यात यश मिळवलं आहे. परंतु आता वाराणासी आणि पूर्वांचलमधील गावं वाचवण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं पाहिजे. ‘जिथे बिमार, तिथेच उपचार’ हा कानमंत्र लक्षात ठेवून आता काम करावे लागणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ओएनजीसी दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करा

मलिक यांनी ओएनजीसी दुर्घटनेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओएनजीसीचा बार्ज बुडाल्याने निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला असून याची जबाबदारी निश्चित करा आणि संबंधितांना शिक्षा करा, अशी मागणी त्यांनी केली. ओएनजीसीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मलिक यांनी गुरुवारी केली होती. परंतु पेट्रोलियम मंत्रालयाकडून त्या बार्जवरील कॅप्टनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा गुन्हा कॅप्टन पुरता मर्यादित न ठेवता संबंधित कंपनीचा मालक, ठेकेदार आणि ओएनजीसीचे प्रिन्सिपल एम्प्लॉयर यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button