कोरोना लसीकरणासाठी ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करा; नाना पटोलेंचा मोदी सरकारला सल्ला

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय. केंद्रातील मोदी सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहीमही फसलीय, असंही नाना पटोले म्हणालेत. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते, पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसूत्रता दिसत नाही म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आज पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते. लोकशाही शासन व्यवस्थेत न्यायव्यवस्था ही आत्मा समजली जाते, परंतु मोदी सरकारने हा आत्माच संपवण्याचे काम सुरू केले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात असल्याची चुकीची माहिती सुप्रीम कोर्टात सादर करून कोर्टाने कोविडमध्ये हस्तक्षेप करू नये, कोर्ट या विषयातील तज्ज्ञ नाहीस असे म्हणत कोर्टाचा अवमान केलाय, असंही नाना पटोले म्हणालेत.
नोटाबंदी जाहीर करताना नरेंद्र मोदींनी कोणत्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेतला होता का? नरेंद्र मोदी अर्थतज्ज्ञ आहेत का? तसे नसतानाही नोटाबंदी जाहीर करून लोकांना वेठीस धरले. सुप्रीम कोर्टात यापूर्वी कोलगेट, टू जी प्रकरण आले होते, त्यावेळच्या यूपीए सरकारने कोर्टाला अशा प्रकारे हस्तक्षेप करू नका, असे म्हटले नव्हते. सुप्रीम कोर्टाने देशातील कोविडची विदारक परिस्थिती पाहूनच टास्क फोर्स स्थापन केला. केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या जिवाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले असून, कोर्टाने टास्क फोर्स स्थापन केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले, असंही नाना पटोलेंनी अधोरेखित केलंय.
शेकडो मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आकलन करून मोदी सरकारने नियोजन केले नाही. त्यामुळे हजारो लोक ऑक्सिजन, योग्य आरोग्य उपकरणे, पुरेशा लसींअभावी मृत्युमुखी पडत आहेत. शेकडो मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने क्रूरपणे दफन केली जात आहेत, तर शेकडो नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत. लस नाही, औषध नाही, ऑक्सिजन नाही, पीएम केअरमधून पुरवलेली उपकरणेही दुय्यम दर्जाची आहेत. मोदींचे आपत्ती धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन किती पोकळ आहे, याची जागतिक प्रसारमाध्यमांनी पोलखोल केली. कोविड महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही, असा संदेश जगभरात गेला असून भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता. पण मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा तसेच नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली, अशी टीकाही नाना पटोलेंनी केलीय.
भारत पहिल्यांदाच राष्ट्रीय महामारीचा मुकाबला करत नाही. यापूर्वी आलेल्या गोवर, देवी तसेच पोलिओचा मुकाबला भारताने समर्थपणे केला आहे. २० कोटी बालकांचे पोलिओ लसीकरण केले त्यावेळी पोर्टल, ऍप, ओटीपी असे काही नव्हते तरीही ठोस धोरण आखून तत्कालीन काँग्रेस सरकारने पोलिओचे समूळ उच्चाटन करून दाखवले, ती धमक मोदी सरकारमध्ये दिसत नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कोरोना संकटाच्या गंभीर परिणामाचा इशारा मोदी सरकारला दिला होता. वेळीच त्यांचा सल्ला ऐकून कार्यवाही केली असती तर देशाला आजच्यासारख्या विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते, असंही पटोलेंनी सांगितलंय.
म्हणून केंद्रातील मंत्री सोनिया आणि राहुल गांधींची खिल्ली उडवतात
केवळ सत्तेचा अहंकार आणि विरोधी पक्षाची दखल घ्यायची नाही, या विकृत मानसिकतेतून केंद्रातील मंत्री, भाजपाचे नेते हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्यात तसेच भाजपाच्या आयटी सेलकडून ट्रोल करण्यातच वेळ घालवला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दलचे कालचे वक्तव्य हे सुद्धा त्यांच्या विकृत मानसिकतेतूनच तसेच सत्तेच्या मस्तवालपणातून आले. विरोधकांनी केलेल्या सूचनांवर अंमलबजावणी केली असती तर आज दिसत असलेले भयनाक दृश्य पहावे लागले नसते. हजारो-लाखो जीव वाचले असते तसेच भारताची जगात एवढी नाचक्की झाली नसती, असेही पटोले म्हणाले.