गुजरातमधील पेंग्विन खरेदीवरून महापौरांचा भाजप नेत्यांवर निशाणा

मुंबई : पेंग्विनवरून भाजप नेत्यांनी जसे घाणेरडे राजकारण केले तसे घाणेरडे राजकारण मला करायचे नाही. मात्र भाजप नेत्यांनी राणीबागेतील पेंग्विन खरेदी आणि देखभाल यावरून शिवसेना युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे आम्ही मग गुजरात अहमदाबाद येथील सायन्स सिटीमध्येमधील पेंग्विन खरेदी, तिकीट शुल्क याबाबत माहिती घेतली. त्याची मुंबईसह तुलना करून अभ्यास केला. त्यावरून मुंबईपेक्षा गुजरातमध्ये पेंग्विन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून तिकीट शुल्कही जास्त घेतले जाते, अशी माहिती देत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला चांगलाच जाब विचारत फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. आता गुजरात अहमदाबाद येथेही पेंग्विन आणल्याने भाजप नेते आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांना ‘गुजरात पेंग्विन’ म्हणायचे का, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. मात्र मुंबईतील पेंग्विनच्या खरेदी आणि देखभालीवरील खर्चावरून आकांडतांडव करीत बेंबीच्या देठापासून कोकळणारे, घाणेरडे राजकारण करणारे भाजपवाले गुजरातमधील पेंग्विन प्रकरणाबाबत गप्प का?, असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित करीत मुंबई महापालिकेतील नगरसेवक, गटनेते, यांसह राज्यस्तरीय नेते यांना चांगलेच फटकारले आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील प्राणी संग्रहालयात जाऊन आणि तेथील पेंग्विन कक्षातील पेंग्विनची खरेदी, त्यासाठी झालेला खर्च, तिकीट विक्री आदींबाबत सखोल माहिती काढून त्याची मुंबईत पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महापालिकेने राणी बागेतील ८ पेंग्विनच्या खरेदीवर अवघे १७ कोटी रुपये खर्चले, तर फक्त ६ पेंग्विनसाठी गुजरात सरकारने तब्बल २६४ कोटींची उधळपट्टी केली. मुंबईत एका पेंग्विनचा मृत्यू झाला तर गुजरातमध्ये एक पेंग्विन गायब आहे. त्याचे नेमके काय झाले, माहित नाही, असे पेडणेकर म्हणाल्या.
मुंबईत राणीच्या बागेत २५ ते ५० रुपये शुल्क घेऊन संपूर्ण राणीबागेत फिरता येते. लहान शाळेतील मुलांना ५० रुपये घेतले जातात. याउलट मुंबईत राणीबागेत दिव्यांग, सिनीयर सिटीझन यांना मोफत प्रवेश आहे. गुजरातमध्ये अशी मोफत सुविधा कुणालाही नाही. राणीबागेत २४ तास तज्ञ डॉक्टर कर्मचारी असतात. गुजरातमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम नाही. गुजरातमधील पेंग्विन कक्षात जे डॉक्टर आहेत ते देखील मुंबईतूनच आपल्याकडचा अनुभव घेऊन तिकडे गेले आहेत. गुजरात मधील पेंग्विन कक्ष उभारण्याकरता मुंबईचीच मदत घेतली गेली असे महापौरांनी सांगितले. पेंग्विन मुद्द्यावर आशिष शेलार यांच्यासमोर वन टू वन चर्चा करा असे भाजपचे लोकं मला उपदेश देतात. आशिष शेलार माझ्याबद्दल जे काही बोलले आहेत त्याबद्दल त्यांनी आधी सर्व महिलांची मागावी असे आव्हान शेलार आणि भाजपाला दिले.
चित्रा वाघ यांची टीका
भाजप, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा किशोर वाघ म्हणाल्या की, त्या स्वत: ५५० किमी प्रवास करत पेंग्विनच्या भेटीला गेल्या. पण वरळी येथे सिलेंडर स्फोटात तडफडून जीव सोडलेल्या लहानग्या बाळासाठी साडे आठ मिनिटांचा प्रवास करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. त्यांच्या युवराजांना पेंग्विन म्हणतात हेही त्यांनी स्वतःच जाहीरपणे कबूल केले आणि युवराज यासाठी त्यांचे अभिनंदनही करतीलच. असो त्यांनी जी गुजरातमध्ये मिळालेल्या आदरतिथ्याची तारीफ केली ती मुळात आपली हिंदू संस्कृती आहे. पण आपल्याला सध्या सुलतानशाहीची जवळीक वाटत असल्यामुळे हिंदूच्या परंपरेविषयी आपण भारावून जाणं स्वाभाविक आहे. आज सर्व मुंबईकरांना हे तर कळून चुकले आहे की सत्ताधारी सेना ही फक्त पेंग्विनसाठी आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करते आणि मुंबईकरांच्या दैनंदिन समस्येवर त्यांना काही देणे घेणे नाही.




