Top Newsराजकारण

सर्वांचे पूर्वज एकच, तर मुस्लिमांना सापत्नपणाची वागणूक का; मायावतींचा आरएसएसला सवाल

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मोहन भागवत यांनी ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचे काम केल्याचे म्हटले आहे. यावरून अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत मोहन भागवत आणि आरएसएसवर टीकास्त्र सोडले आहे. यातच आता बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला असून, सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सापत्नपणाची वागणूक का, असा सवाल केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणुका असून, जवळपास सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यामध्ये भाजप आघाडीवर असून, जागा कमी झाल्या तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्ता राखण्यात यशस्वी होतील, असा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. दुसरीकडे मायावती यांचा बसप प्रबुद्ध संमेलनाच्या माध्यमातून ब्राह्मण कार्ड वापरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यातच ब्राह्मणांची सुरक्षितता, सन्मान आणि प्रगतीचे आश्वासन मायावतींनी दिले असून, मुस्लिम बांधवांना काँग्रेस आणि समाजवादी पक्षापासून सावध राहण्यास सांगितले आहे. यातच मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर टीका करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारतात हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच असतील, तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम बांधवांना सावत्रपणाची वागणूक कशासाठी देतात, असे विचारत संघ आणि भाजपवाल्यांचे ओठावर एक आणि पोटात एक असाच व्यवहार असतो, असे टीकास्त्र सोडले आहे. यापूर्वी डीएनए बाबत केलेल्या वक्तव्यावरूनही मायावती यांनी संघ आणि भाजपवर निशाणा साधला होता.

भारतात हिंदूंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही. फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले. ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचे वातावरण निर्माण केले. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केले. इस्लाम धर्म भारतातून नष्ट होईल असे सांगितले गेले. पण तसे झालंय का? तर नाही. मुस्लिमांना आज सर्व स्तरांमध्ये हक्काचे स्थान आहे, असे मोहन भागवत म्हणाले. ब्रिटिशांना जे हवे होते ते त्यांनी त्यावेळी साध्य केले. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवला आणि फोडाफोडी केली. आपल्याला आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वच एकच होते. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असेही ते म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button