इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्याच्या तोंडावर भारताला धक्का, सलामीवीर मयांक अगरवाल जखमी

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे मयांक अग्रवाल पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. नेट्समध्ये सरावादरम्यान मोहम्मद सिराजने टाकलेला चेंडू मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर वेगवान चेंडू आदळला. त्यामुळे मयांक अग्रवालच्या डोक्याला दुखापत झाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली.
भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम इथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधी सरावादरम्यान मयांक अग्रवालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गोलंदाज मोहम्मद सिराजने नेटमध्ये फेकलेला चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला आणि मयांक जखमी झाला आहे. त्याला भारतीय टीमच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
https://twitter.com/BCCI/status/1422182862883889153
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मयांक अग्रवालबाबत एक प्रेसनोट जाहीर केली आहे. यामध्ये मयांकला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मयांकची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे.
भारत आणि इंग्लंडदरम्यान ४ ऑगस्टपासून कसोटी सिरीजला सुरूवात होत आहे. त्याआधी भारतीय फलंदाज शुभमन गिल, ऑलराऊंडर वॉशिग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज आवेश खान दुखापतीमुळे आधीच संघाच्या बाहेर आहेत. त्यात मयांग अग्रवालही दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय टीमपुढच्या समस्या वाढल्या आहेत.
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंड दौऱ्यावर
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात सामिल होण्यासाठी फलंदाज सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ पूर्णपणे फिट झाले आहेत. दोघेही श्रीलंका दौऱ्यावर असताना त्याठिकाणी संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोघांच्या इंग्लंडला जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र आता दोन्ही खेळाडूंच्या तीन कोविड-१९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे पुढील २४ तासांत दोघेही इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने शॉ आणि यादवला इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.




