![](https://dg24.in/wp-content/uploads/2022/01/Sharad-Pawar.jpg)
मुंबई : दोन वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणलं आहे. तुमचे सरकार चांगलं काम करत आहे म्हणून अनेकांना अस्वस्थता आहे. सत्ता येते, सत्ता जाते, पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ मी पाहिलं नाही. सत्ता आली तर लोकांसाठी काम करायचं असतं आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते. पण भाजपच्या लोकांचं वेगळं आहे, अशा शब्दात पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत पवार बोलत होते. नवाब मलिक यांच्यावरील ईडी कारवाईवरुनही पवारांनी भाजपवर टीका केली. नवाब मलिक यांना आत टाकलं तेव्हा ममता बॅनर्जी यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे चार लोकांना अटक झाली. मात्र आम्ही हटलो नाही तर लढलो, संघटना वाढवली, तुम्हीही तेच करा. नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. लोक तुमच्या बरोबर आहेत. लोकांचा पाठिंबा आहे. त्यांच्याशी असलेल्या बांधिलकीशी तडजोड करायची नाही, असा सल्लाही पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.
पंतप्रधान मोदींना यूक्रेनमधील विद्यार्थ्याचं काही पडलेलं नाही !
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टीकास्त्र डागलं. यूक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरु आहे त्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त विद्यार्थी अडकले आहेत. त्या संकटाकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत. पालक आणि विद्यार्थी प्रचंड त्रास सहन करत आहेत. युनोमध्ये बैठक घेतली तेव्हा भारत तटस्थ राहिला. आपण रशियाविरोधात भूमिका घेतली नाही. यूक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही म्हणून यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत, अस शरद पवार यांनी म्हटलंय.
त्याचबरोबर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना, मोदी सरकारचे ४ मंत्री तिकडे गेले आहेत. पण एकही मंत्री यूक्रेन किंवा रशियात गेला नाही. केंद्र सरकारची चर्चेसाठी तयारी नाही. राहुल गांधी आणि आम्ही सर्व विरोधात चर्चेला तयार होतो. मात्र, पंतप्रधान मोदी यांना विद्यार्थ्यांचे काही पडलेले नाही, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केलीय.