नितीश राणाचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह; आयपीएलआधी शाहरुखला मोठा दिलासा

मुंबई : आयपीएल क्रिकेटचा महामेळा (IPL 2021) 9 एप्रिलापासून सुरु होत आहे. सर्वच संघांचे ट्रेनिंग कॅम्प (IPL Training Camp) विविध शहरांत सुरु आहेत. अशातच आयपीएल सुरु होण्याआधी शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) मोठी खुशखबर आहे. कोलकात्याचा डावखुरा आक्रमक फलंदाज नितीश राणाचा (Nitish Rana) कोरोना चाचणी अहवाल आता निगेटीव्ह आला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी नितेश राणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. म्हणजेच 21 मार्चला त्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्याने त्याची तब्येत व्यवस्थित आहे. त्याला आता कसलाही त्रास होत नाहीय. तो आता त्याचं रुटीन वर्क करतोय. अशात त्याची कोरोना टेस्टही निगेटिव्ह आल्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या ट्रेनिंग कॅम्पमध्येही तो सहभागी होऊ शकतो.
मागील आयपीएलच्या मोसमात नितीश राणा याने 14 मॅचमध्ये 252 धावा केल्या होत्या. पाठीमागच्या तीन मोसमात त्याने कोलकात्यासाठी सातत्याने धावा केल्या आहेत. कोलकात्याच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक तो मानला जातो. त्याचबरोबर आयत्या वेळी गोलंदाजी टाकून विकेट घेण्यातही तो माहिर आहे.
नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये नितीश राणाने 7 मॅचेसमध्ये 66.33 च्या सरासरीने 398 फटकावल्या होत्या. आयपीएलमध्ये नितीश राणा सुरुवातीच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळला. तिथेही त्याने खूप चांगली फलंदाजी केली. त्यानंतर तो कोलकात्याच्या ताफ्यात सामिल झाला. गेल्या तीन वर्षांपासून नितीश कोलकात्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. कोलकात्याचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 11 एप्रिल रोजीज सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. त्याअगोदर नितीश राणा फिट होईल, अशी आशा संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
आयपीएलची तयारी पूर्ण
इंडियन प्रीमयर लीगचं (Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.