फोकस

‘जेवाद’ चक्रीवादळाचा धोका ! अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईतील लोकल सेवेला पावसाचा फटका

मुंबई: मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री पाऊस पडल्यानंतर मध्येच थांबला होता. मात्र बुधवारी सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मराठवाडा आणि कोकण भागासह अनेक ठिकाणी ३ डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामानातील या अचानक बदलामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांत पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या वादळी चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने ‘जेवाद’ चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार करण्यात आला आहे. यामुळे हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे ३ डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. ३ डिसेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल आणि त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात हा अचानक पाऊस येण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अग्नेय अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे पूर्व-मध्य अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंदमान समुद्राच्या मध्यभागी असलेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारपर्यंत पश्चिम-उत्तर आणि पश्चिमेकडे सरकेल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला होता. याच कारणास्तव बुधवारी महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. आतापर्यंत हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणेच घडले आहे. आता हे वादळ ४ डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकणार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल.

लोकलला पावसाचा फटका

या पावसाचा फटका मुंबईची लाईफ लाईन अर्थात मुंबई लोकलला सहन करावा लागतोय. मुंबईत बुधवारपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आज सकाळपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे देखील उशीराने धावत आहेत. यात बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धावणाऱ्या सर्व जलद गाड्या जवळपास पावूण तास उशीराने धावत आहेत. यामुळे स्लोक ट्रॅकवरच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळी १०. २० नंतर बोरिवली रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या सर्व जलद लोकल जवळपास अर्धा ते पाऊण तास उशारीने धावत असल्याचे पाहायला मिळाले. वांद्रा स्थानकातून १०.५४ ला सुटणारी चर्चेगेट फास्ट लोकल आज ११. २० होऊन गेले तरी वांद्रे स्थानकावर पोहचली नव्हती. या मनस्तापाचा सामना प्रवाशांना सहन करावा वागतोय.

गुजरातमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रातील या चक्रीवादळामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे गुजरातमध्येही येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांना त्यांची कापणी केलेली पिके सुरक्षित स्थळी नेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

गुजरातच्या समुद्रात सुमारे १५ मच्छीमार बेपत्ता

गुजरातमधील गिर सोमनाथमध्ये रात्री उशिरा पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे १३ ते १५ बोटी समुद्रात बुडाल्याचं वृत्त आहे. या अपघातात सुमारे १५ मच्छीमार बेपत्ता झाल्याची माहिती आहे. सध्या त्या मच्छीमारांचा शोध सुरू आहे. पण, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button