Top Newsराजकारण

मोदी सरकारमध्ये मात्र कुणालाच मंत्री आहोत असे वाटत नाही; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई: राज्यात सरकारचं अस्तित्व नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. राज्यात प्रत्येकजण स्वत: मुख्यमंत्री समजतो ही चांगली गोष्ट आहे. ही लोकशाहीची ताकद आहे, असं सांगतानाच केंद्रातील मोदी सरकारमध्ये मात्र, कोणत्याही मंत्र्याला ते मंत्री आहेत असं वाटत नाही. एवढंच काय खासदारांनाही ते खासदार आहेत, असं वाटत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला. या राज्याचा प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री आहे. जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आहेत तेव्हा पासून 11 कोटी लोकांना वाटतं मी मुखय्मंत्री आहे. मी सत्ताधारी आहे असं लोकांना वाटतं. लोकशाहीतील ही मोठी घटना आहे. मोदी सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्याला तो मंत्री आहे असं वाटत नाही. खासदार आहे असं वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यात कायद्याचं राज्य नाही या फडणवीसांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. महाराष्ट्रात काय तरी द्याचं पूर्वी राज्य होतं. ते दोन वर्षापूर्वी घालून कायद्याचं राज्य आलं. त्यामुळे काही तरी द्यावाल्यांची वेदना समजू शकतो, असा चिमटा त्यांनी काढला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महान योद्धा होते. मराठी माणसासाठी हिंदुंसाठी ते लढवय्ये महानायक होते. त्यांचा आदर्श प्रेरणा आमच्या मनात कायम आहे. केवळ एका दिवसासाठी नव्हे तर त्यांच्या स्मृती मनात अखंड असतात. बाळासाहेब असते तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता. नेमका कोणत्या गोष्टीला ब्रेक लागला असता हे आता मी सांगत नाही. पण ठाकरेंनी या देशाला राष्ट्रभक्तीचं हिंदू विचाराचं तेज प्राप्त करून दिलं. हिंदू या पुढे मार खाणार नाही हे बळ या देशाला देण्याचं काम त्यांनी केलं. हिंदू पळपुटा नाही हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. मराठी माणसाच्या मनगटात चेतना जागवली, असं त्यांनी सांगितलं.

नकली हिंदुत्ववाद्यांकडून देशाला कसा धोका आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितलं आहे. त्यांचं दसरा रॅलीतील भाषण ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. निवडणुका येतात तेव्हा हे लोक हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करतात. भारत-पाकिस्तान वाद काढतात. निवडणूक जिंकण्याची एकही संधी सोडत नाहीत. दंगल भडकावी आणि हिंसाचार व्हावा असं या लोकांना वाटतं. हे लोकं कोण आहेत सर्वांना माहीत आहे. पार्टी प्रमुख उद्धव ठाकरेंनी अशा लोकांना खुले आव्हान दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button