वैज्ञानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारत, ब्राझीलमध्ये कोरोनाचा मोठा फैलाव
'नेचर जर्नल'च्या अहवालातील निष्कर्ष

मुंबई : भारत आणि ब्राझीलच्या सरकारने कोरोना व्हायरसबाबत वैज्ञानिकांनी दिलेला सल्ला न ऐकल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट भीषण झाली आहे. वैज्ञानिकांचा सल्ला भारत आणि ब्राझीलच्या सरकारने ऐकला असता तर कोरोना व्हायरसची धोकादायक दुसरी लाट नियंत्रणात आणणे सोपे झाले असते. भारत आणि ब्राझील सरकारने वैज्ञानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोना नियंत्रणात आणण्याची चांगली संधी गमावली, असा निष्कर्ष प्रसिद्ध ‘जर्नल नेचर’मध्ये काढण्यात आला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. १५ कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून ३२ लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती भीषण होत आहे. त्यामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशाचे नाव प्रामुख्याने आहे. सध्या या दोन देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून येथे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये ही भयावह परिस्थिती निर्माण का झाली याचे कारण ‘जर्नल नेचर’मधून समोर आले आहे.
गेल्या आठवड्यात भारतात ४ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण एका दिवसात आढळले. तर ३५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. हे आकडे इतके भयावह आहेत की, जगातील अनेक देश भारताच्या मदतीला धावून आलेत. कोणी ऑक्सिजन, कोणी व्हेंटिलेटर तर कोणी आयसीयू बेड्सची मदत करत आहे. नेचर जर्नलनुसार, भारत आणि ब्राझील जवळपास १५ हजार किलोमीटर दूर आहेत, परंतु दोन्ही देशात कोरोना ही एकच समस्या आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी वैज्ञानिकांचा सल्ला ऐकला नाही किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यास उशीरा केला. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो सतत कोरोनाला छोटा व्हायरस करून बोलवत असत. त्यांनी वैज्ञानिकांच्या सल्लाकडे अक्षरशः दुर्लक्ष केले. शिवाय त्यांनी सांगितलेली पद्धत देखील ब्राझीलने नाकारली. ब्राझीलमधील सरकारने मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग असे नियम व्यवस्थित लागू केले नाहीत. तर भारत सरकारने वैज्ञानिकांच्या सल्लावर वेळीच अॅक्शन घेतली नाही, ज्यामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. देशामध्ये हजारोच्या संख्येने लोकं निवडणूक आणि धार्मिक कार्यक्रमाला उपस्थितीत राहत आहेत. अशा प्रकारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वैज्ञानिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. ज्यामुळे अमेरिकेमध्ये ५.७० लाख लोकांचा मृत्यू झाला. जगातील सर्वाधिक कोरोनाचे मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.
‘नेचर जर्नल’च्या अहवालात म्हटले आहे की, भारतात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या उच्चांकी होती. तेव्हा ९६ हजार लोकांना कोरोनाची लागण होत होती. त्यानंतर यावर्षी मार्चच्या सुरुवातीला कोरोनाची प्रकरणे कमी होऊन १२ हजारावर पोहोचले. हे पाहून भारत सरकार ‘आत्मसंतुष्ट’ झाला होता. यादरम्यान सर्व व्यवसाय सुरू केले गेले. पुन्हा लोकांची गर्दी होऊ लागली. मग लोकं मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे कमी करू लागले. निवडणूक रॅली, आंदोलन आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ लागले. हे सर्व मार्चपासून ते एप्रिलपर्यंत चालू राहिले. ज्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली.
भारतातील आणखी एक समस्या अशी आहे की, येथील वैज्ञानिक कोरोना रिचर्स डेटाला सहज एक्सेस करू शकत नाही. ज्यामुळे वैज्ञानिक अचूक भविष्यवाणी करण्यात अपयशी होतात. वैज्ञानिकांना कोरोना चाचणीचे अहवाल आणि रुग्णालयात होत असलेल्या क्लिनिकल चाचण्याचे योग्य आणि पर्याप्त परिणाम मिळत नाहीत. अजून एक मोठी समस्या म्हणजे जिनोम सिक्वेन्सिंग मोठ्या प्रमाणात देशात होत नाही आहे.
देशाचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कृष्णस्वामी विजय राघवन यांनी देशातील आव्हानांची कबुली दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, जसे सरकार व्यतिरिक्त संशोधन करणारे वैज्ञानिक डेटा एक्सेस करू शकत आहे. तथापि, काही डेटा अद्याप स्पष्ट झालेला नाही आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. नेचरमध्ये लिहिले आहे की, ‘दोन वर्षापूर्वी देशात १०० अर्थशास्त्रज्ञ आणि डेटा रणनीतिकारांनी मोदी सरकारला पत्र लिहून डेटा एक्सेस करण्याची मागणी केली होती.’ हे पत्र तेव्हा लिहिले होते जेव्हा नॅशनल स्टॅटिस्टिकल कमीशनच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. त्यांची ही मागणी होती की, आम्हाला सरकारी डेटाचा पूर्ण एक्सेस मिळत नाही. त्यामुळे जर्नलमध्ये असे लिहिले आहे की, संशोधक आणि सरकारमध्ये नेहमी कठीण संबंध राहिले आहेत. परंतु कोरोना दरम्यान अशा संबंधांमुळे समस्या उद्भवू शकतात.




