
पुणे : मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे, अशा शब्दात काँग्रेस नेता कन्हैया कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीनं कन्हैया कुमारच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार मोहन जोशी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आदी नेते उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि तलावर देऊन कन्हैया कुमारचा सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला कन्हैया कुमारने हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेल्या सीडीएस जनरल बिपिन रावत आणि अन्य सैन्य अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर बोलताना कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. काँग्रेस असा पक्ष आहे जो पूर्ण भारतीयतेला सोबत घेऊन चालतो. ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये यावं आणि ज्यांना देश विकायचा आहे त्यांनी भाजपमध्ये जावं, असे म्हटले आहे.
देशाच्या नावावर मित्रांचं भलं करण्याचं काम सुरु आहे. आतापर्यंत कधीच डिझेल १०० रुपये लिटर झालं नाही. महागाई आकाशाला पोहोचली आहे. गांधींजींची हत्या करणारे लोक आज देश विकायला निघाले आहेत. पंतप्रधान म्हणजे देश आहे का? पंतप्रधानांबद्दल काही बोललं की देशद्रोही ठरवलं जातं. जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार? असा खोचक सवालही कन्हैया कुमारने विचारलाय. सध्या व्हॉट्सअपवर देशाबद्दल काहीही बोललं जात आहे. यांना वाटतं कुणावरही यूएपीए लावू, बोलती बंद करु, पण साहेब हा भारत आहे, असंही कन्हैया कुमारने ठणकावून सांगितलं.
आम्ही दोनशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना घालवलं, तुम्ही कोण आहात? लोकशाहीत कधीही विकल्प हिनता नसते, विकल्प असतोच. काँग्रेस हा समानता मानणारा पक्ष आहे. काँग्रेस हा समतेवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो, असंही कन्हैया कुमार यावेळी म्हणाला.
भाजपकडून लोकशाही मूल्यांना तिलाजंली : थोरात
आज लोकशाही वाचवा म्हणण्याची वेळ का येते, याचा विचार करण्याची गरज आहे. सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आज जगात ५१ व्या क्रमांकावर आला आहे. वेगळ्या पद्धतीनं राजकारण सुरु झालं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा लोकशाहीला होईल असं वाटलं होतं. पण २०१२ पासून या तंत्रज्ञानाचा वापर हा राजकीय नेत्यांची बदनामी करण्यासाठी केला गेला. नवी झुंडशाही निर्माण झाली. त्याचा परिणाम मतांवर झाला. भाजपने लोकशाही मूल्यांना तिलाजंली दिली. त्यामुळे पुन्हा लोकशाही वाचवण्याची आणि त्यासाठी काँग्रेसला सत्तेत आणण्याची जबाबदारी आपली असल्याचं सांगत बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.
काँग्रेसशिवाय पर्याय नाही : तांबे
सत्यजित तांबे म्हणाले की, लोकशाही दिल्लीतून नाही तर गल्लीतून बळकट करावी लागेल. फक्त लोकसभा आणि विधानसभेत लोकशाही बळकट करुन चालत नाही. त्यासाठी महापालिका निवडणूक महत्वाची असते. महापालिकेत काँग्रेस बळकट व्हायला हवी. या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी डाव्या विचारांचा तरुण हा काँग्रेसमध्ये येतो हे लक्षात घ्यायला हवं. लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही.




